
पिंपरी (हिंदवी न्यूज)
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचा दिलासा साहित्य संस्थेच्या वतीने साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. अशोकमहाराज गोरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे आणि अभंग गाथा देऊन सन्मान करण्यात आला. निमित्त होते कवी प्रा. डॉ.नितीन करडेकर यांच्या ” कनिक’ या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाचे. दिलासा साहित्य संस्थेने या काव्यसंग्रह प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री आणि बाल साहित्यकार डॉ. संगीता बर्वे, साम टीव्हीचे माजी व्यवस्थापक हनुमंत कुंभार, ज्येष्ठ चित्रकार रमेश नावडकर, दिलासा साहित्य संस्थेचे नारायण कुंभार, प्रकाशक सुनील उंब्रजकर, राधाबाई वाघमारे, विजय शेंडगे,अर्जुन चौधरी, मुरलीधर दळवी, विलास कुंभार , अंबादास रोडे, प्रकाशक अनिल शिंदे, विनिता दापोरकर हे मान्यवर उपस्थित होते. दिलासा साहित्य संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, ” महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अभंग तुकाराम ” या चित्रपटात संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणारे योगेश सोमण महाराष्ट्र साहित्य परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात , विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ||. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तुकोबाराय यांच्या या अभंगाप्रमाणे ‘ अभंग ‘ असे कार्य साहित्य संवर्धन आघाडीने करावे.
ते पुढे म्हणाले, ” परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीकोनातून निश्चित पणे नवीन कार्यकारिणी आगामी काळात उल्लेखनीय कार्य करेल याचा विश्वास वाटतो. “साहित्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र साहित्य परिषद निश्चितपणे सकारात्मक कार्य करणार , असा मनोदय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी यावेळी व्यक्त केला.
![]()