पिंपरी(हिंदवी न्यूज )
कष्टकरी कामगार हा राष्ट्रीय प्रवाहातील मूळ आधारस्तंभ आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरील त्याचे योगदान अनमोल आहे. यासाठी कामगारांच्या श्रमाचे मोल जपणे आवश्यक आहे. सध्याच्या युद्धज्वराच्या परिस्थितीत आणि अशांततेच्या काळात औद्योगिक केंद्रे आणि श्रमिक जगत स्थिर राहिले तर सामाजिक स्वास्थ टिकून राहील. यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होणे गरजेचे आहेत. असे मत गुणवंत कामगार तानाजी एकोंडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकाराम नगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनी ” कामगारांचे सामाजिक जीवन” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. प्रकाश घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक होते. शिवाजीराव शिर्के, ह. भ. प. शामराव गायकवाड, ह भ प यादव तळोले, शंकर नानेकर , कामगार कल्याण केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कारळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
गर्जा महाराष्ट्र माझा.. या स्फूर्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कवी शामराव सरकाळे यांनी कामगार कष्टाचा दास,मनाला दुखवू नका त्यास, श्रमाचे मोल देऊन खास, देशाचा घडवितो विकास. ही कविता याप्रसंगी सादर केली. सुरेश कंक आणि प्रकाश घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदीप मरळ, शैलजा आवडे, संगीता क्षीरसागर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. केंद्र प्रमुख अनिल कारळे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी मानले.
![]()
