महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा; खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप
पिंपरी,(हिंदवी न्यूज)-औंध-रावेत बीआरटी. रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. तीव्र उतारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
या पुलाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली होती. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होतील, अशी भीती व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी पुलाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अपघात झाला. भविष्यात मोठा अपघात झाल्यास पुण्यातील नवले पुलासारख्या दुर्घटना घडू शकतात.
याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, या पुलाच्या तांत्रिक त्रुटी मी यापूर्वीच प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु भविष्यात नागरिकांच्या जीवाशी खेळू नये यासाठी पालिका प्रशासनाने उतारामध्ये त्वरित दुरुस्ती करावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
![]()
