हिंदवी न्यूज | पिंपरी
मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी लोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१३) आंदोलन करण्यात आले. यावेळी मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना दाखले म्हणाले की, मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या विविध संघटनेच्या माध्यमातून लोकसंख्येनुसार अनेक वर्षांपासून शंकरभाऊ तालिके यांच्या नेतृत्वाखाली उप-वर्गीकरणाची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी ही महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व पोटजातींना न्याय मिळावा म्हणून उप-वर्गीकरणाची गरज असल्याचा निकाल दिला आहे. पंजाब, तमिळनाडूसह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारची अंमलबजावणी झाली असून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गठित केलेल्या बीदर समितीचा अहवाल सादर झाला असून त्यानुसार तातडीने निर्णय घ्यावा.
याशिवाय सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. तसेच ‘आर्टी’ (ARTI) चे मुख्य कार्यालय हाप्किन महा मंडळाच्या पाच एकर जागेवर उभे करावे. कारण २०१२ साली महापालिकेत हा ठराव पारित झाला असून ती जागा हस्तांतरित करावी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात धमकी देणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सरकारवर विश्वास असून प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले असल्याचे दाखले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-वर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा व शासनाने लवकरात लवकर सकारात्मक आदेश काढावेत अशी मागणी शेकडो पदाधिकाऱ्यांनी केली. या प्रसंगी निगडी येथील मधुकर पवळे ब्रिज जवळच असलेल्या महाराणा प्रताप आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी हिंदू मातंग एकता सेना तसेच शिवशाही शासन पक्षाचे शेकडो पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
![]()
